शाश्वत समृद्धीकडे
सेंद्रिय शेती ही काळाची गरज तर आहेच पण नीट विचार केला तर ती शेती पद्धती ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मृदशास्त्रामध्ये मातीला सजीव मानलेले आहे. कारण त्यात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव व गांडुळे अविरतपणे कार्यरत असतात. आणि जमिनीवर पडणाऱ्या पालापाचोळ्याचे खतात – झाडाला उपलब्ध स्वरुपात – रुपांतर करण्याचे कार्य हे सूक्ष्मजीव व गांडुळेच करीत असतात. पालापाचोळ्यामधील पोषक द्रव्ये झाडाला / पिकाला वापरता येतील अशा रुपात आणण्याचे बहुमूल्य कार्य सूक्ष्मजीव व गांडुळे करतात. त्या प्रक्रियेद्वारे निसर्ग वाळलेल्या पानात बंदिस्त असलेली पोषक द्रव्ये मुक्त करण्याचे काम किती सहजगत्या करून घेतो हे आपल्या लक्षात येईल.
हे करीत असताना त्या खतातील पोषक तत्वे वाढवण्याचं कामही होते. जेव्हा रासायनिक घटकांचा वापर करून शेती केली जाते तेव्हा त्या रासायनिक घटकांमुळे मातीत असणाऱ्या या सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो, हळूहळू त्यांची संख्या कमी होऊ लागते……आणि मातीमधले जीवन संपुष्टात येते. अशा वेळी माती हे पिके वाढविण्याचे केवळ एक भौतिक माध्यम उरते.
गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे आपण पुस्तकात वाचतो. पण शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर करून ह्या मित्राचा सर्वनाश करून आपण उत्पादन वाढीची स्वप्ने पाहत आहोत !!!! ही स्वप्ने पूर्ण होण्याचा आपला मुलाधारच चुकीचा आहे. सेंद्रिय शेती हीच शाश्वत शेती असल्याचे विविध संशोधनातून आता सिद्ध होत आहे. ते खरं आहे कारण ते निसर्ग नियमाला धरून आहे. आपली प्रगती ही निसर्गाबरोबर चालूनच होणार आहे हे आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये मधमाश्या आणि इतर उपयुक्त कीटकांचा परागीभवन व कीड नियंत्रणासाठी उपयोग होतो. बरेच पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या किडी खावून फस्त करतात आणि त्यांना नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये पक्ष्यांनाही फार मोलाचे स्थान आहे. म्हणूनच अशा प्रकारची शेती करणाऱ्यांनी पक्ष्यांसाठी निवारे उभारावेत ….. म्हणजेच भारतीय प्रजातीच्या विविध वृक्षांची लागवड आपल्या शेतावर करावी.
सेंद्रिय शेती करीत असताना खत म्हणून शेण, राख तसेच जमिनीवर पडणारा पालापाचोळा आणि पिकांचे अवशेष इत्यादींचा वापर करता येतो. पिकांचे किडी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी गोमुत्र, कडुलिंब तसेच इतर विविध वृक्षांच्या पानांचा वापर करता येतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या पीक पद्धतीचाही वापर करता येतो. शेतीसाठी लागणारे असे विविध घटक (नैसर्गिक किवा सेंद्रिय खते, पीक संवर्धक घटक, बुरशीनाशके आणि कीटकनाशके इत्यादी) आता बाजारातही उपलब्ध आहेत. तसेच अशा शेतीचं ‘सेंद्रिय प्रमाणीकरण’ केल्याने शेतीतील उत्पन्नाला अधिक दरही मिळू शकतो.
आमची कार्यपद्धती
अशा शेती प्रकल्पामध्ये आम्ही त्याचे नियोजन, फळे आणि भाजीपाला लागवड आणि त्या पिकांची जोपासना (खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण इत्यादी) यासाठी मार्गदर्शन करतो.
हे सर्व करताना शेतावरील दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी (शेतावर होणारे काम, येणारे उत्पन्न, तसेच लागणाऱ्या सर्व घटकांच्या नोंदी इत्यादी ठेवण्यासाठी योग्य असे आराखडे ) आणि शेताचे सेंद्रिय
प्रमाणीकरण याकरिता मार्गदर्शन करतो.
- आवश्यकतेनुसार शेताला भेट देऊन मार्गदर्शन
- भेटीच्या वेळी मागील सांगितलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यकतेनुसार पुढील कामांचे नियोजन.
- काही कामांचे प्रात्यक्षिक – उदा. आंबा काजू इत्यादी फळ झाडांना खते देताना झाडांच्या वयाप्रमाणे आणि विस्ताराप्रमाणे गोलाकार चर (रिंग) तयार करावा लागतो. झाडाच्या विस्ताराप्रमाणे रिंगचा आकार लहान किवा मोठा करावा लागतो. याचे शेतावर प्रात्यक्षिक दाखवून त्यामागील शास्त्रीय कारण समजावून सांगितले जाते.
- पुढील कामांसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व नियोजन.
आमच्या नियमित भेटीमुळे शेतीच्या कामामध्ये सातत्य व अचूकता टिकवता येते आणि त्यामुळे अशा प्रकल्पांची व्यावहारिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य दिशेने वाटचाल होण्यास मदत होते. अर्थातच शेतीचे यश हे आपल्या प्रयात्नांबरोबरच निसर्गावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवायला हवं. निसर्गाच्या विविध घटकांचा – हवा, पावसाचे कमी / अधिक प्रमाण, वारा, थंडी, उन्हाचं प्रमाण / तीव्रता, ढगाळ हवामान इत्यादी – पिकांच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पन्नावर परिणाम होत असतो.

saw yur website and blog, its amazing and keep up the good work,
will recommend friends to visit yur blog.
I WENT TO THROUGH YOUR INFORMATION. ILIKED IT TO MUCH.